पुण्याच्या नागरी सुविधांसाठी नियोजनाच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. पुण्याचा विकास आराखडा या वर्षी तयार होत आहे. विविध क्षेत्रांत मूलभूत काम करणाऱ्या समाजसेवी संस्था, नागरिक, प्रशासन व राजकीय नेतृत्व यांनी एकात्मिकपणे काम केले तरच हा विकास आराखडा खऱ्या अर्थाने पथदर्शक ठरेल.- विवेक वेलणकरभारतातील अत्यंत वेगाने विकास होणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचा अग्रक्रम लागतो. भारताचा विकासदर नऊ टक्के असताना पुण्याचा विकासदर १५ टक्क्यांच्या वर पोचला आहे. गेल्या पंधरा वर्षांत पुण्याची लोकसंख्या अडीच पटीने वाढली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून पाणीपुरवठा, वीजपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, वाहतूक अशा सर्वच नागरी सुविधांवर प्रचंड ताण आला आहे. पुण्यातील औद्योगिक व शैक्षणिक सुविधा बघता पुढील पंधरा वर्षांत पुण्याची लोकसंख्या एक कोटीच्या घरात पोचली तर आश्चर्य नको. या पार्श्वभूमीवर नागरी सुविधांसंदर्भातील पुण्याच्या समस्या फक्त आजचाच नाही तर भविष्याचा विचार करून सोडवाव्या लागतील. यासाठी एकात्मिक नियोजन अत्यावश्यक आहे. यातील काही महत्त्वाच्या घटकांचा आढावा घेऊ या.
१) झोपडपट्टी विकसन - पुण्याची ४० टक्के लोकसंख्या दोन लाखांहून अधिक झोपड्यांमध्ये राहत आहे. शहराच्या नागरी सुविधांचा विकास व नियोजन करताना या घटकांना सर्वांत महत्त्वाचे स्थान देणे आवश्यक आहे. सुदैवाने "जेएनएनयूआरएम' व "एसआरए' या दोन यंत्रणांकडून किमान या विषयांवर अभ्यास करून प्रस्तावित योजना तरी सादर झाल्या आहेत. आज गरज आहे, ती या दोन्ही यंत्रणांची सांगड घालण्याची. झोपडपट्टी पुनर्वसनात २५० चौरस फुटांचे घर का ३५० चौरस फुटांचे घर? ज्या झोपडपट्ट्यांचे विकसन होणार तेथील किमान ७० टक्के झोपडपट्टीवासीयांची संमती मिळवून योजना राबवावी का? बांधलेल्या इमारती चार मजली असाव्यात, की आठ मजली? झोपडपट्टीवासीयांनी या नवीन घरांसाठी काही रक्कम भरावी किंवा नाही? मूळ जागा मालकांना काय मोबदला मिळावा?.. अशा अनेक विषयांवर या दोन्ही यंत्रणांत एकमत नाही. हे सर्वच प्रश्न मूलभूत नागरी सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. या विकसनामधून उभा राहणारा सहा कोटी चौरस फुटांचा टीडीआर हा विषय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः हा टीडीआर शहराच्या काही विशिष्ट भागांतच वापरला जाण्याची दाट शक्यता बघता, त्याचा ताण नागरी सुविधांवर येणार हे निश्चित. याकरिता नागरी सुविधा नियोजनामध्ये झोपडपट्टी विकसन, त्यातून उद्भवणारा टीडीआर यांचा विचार होणे अत्यावश्यक आहे. या वर्षात (२००८) "एसआरए' आणि "जेएनएनयूआरएम' या दोन्ही यंत्रणांच्या एकात्मिक नियोजनातून या प्रश्नावर सर्वसमावेशक धोरण ठरेल, अशी आशा करू या.
२) घरबांधणी - पुण्यातील वाढती लोकसंख्या बघता, घरांची मागणी सातत्याने वाढणार आहे. परंतु आज उपलब्ध जमिनीची टंचाई बघता (यूएलसी रद्द होऊनसुद्धा) बहुमजली इमारती उभ्या राहणार हे नक्की. यासाठी आवश्यक ते धोरणही नुकतेच आखण्यात आले आहे. या पुढच्या काळातील गृहबांधणीचा कल बघता २०-२५ वर्षांपूर्वीच्या दोन-तीन मजली गृहनिर्माण संस्थांच्या जागेवर बहुमजली इमारती उभ्या राहण्याची शक्यता आहे. झोपडपट्टी पुनर्वसन व अन्य ठिकाणचा टीडीआर यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जाईल. या सगळ्यांचा नागरी सुविधांवर येणारा ताण लक्षात घेऊन नियोजन करावे लागेल. यासाठीचे नियोजन व धोरण या वर्षी होईल, अशी आशा करू या.
पाणीपुरवठा, वीजपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, वाहतूक या सर्वांवर वरील दोन्ही घटकांचा परिणाम आहे. त्यामुळे त्यांचा एकात्मिक विचार होणे गरजेचे आहे. या दृष्टीने काही महत्त्वाच्या घटकांचा विचार करू.
१) पाणीपुरवठा - पुणेकर या बाबतीत अत्यंत सुदैवी आहेत. पुण्यात आज दरडोई दर दिवशी दोनशे लिटरपेक्षा अधिक पाणी (जागतिक प्रमाण १२५ लिटर) मिळते. परंतु आजही या पाण्याचे समान वाटप होत नसल्याने अनेक भागांत विशेषतः समाविष्ट भागांत अत्यंत कमी पाणी मिळते आहे. त्याचप्रमाणे आज पुण्याला मिळणाऱ्या ८५० एमएलडी पाण्यापैकी ३० टक्के पाणी वितरण यंत्रणेतील दोषांमुळे वाया जाते. शुद्ध केलेले पाणी अशाप्रकारे वाया जाणे हा सामाजिक गुन्हाच म्हटला पाहिजे.
२) वीजपुरवठा - वीजटंचाई ही आपली राष्ट्रीय समस्या आहे. पुण्यातील दीड लाखांहून जास्त ग्राहकांसाठी सातशे मेगावॉट वीज लागते. "सीआयआय'च्या प्रयत्नातून पुणे मॉडेल उभे राहिले. त्यामुळे आजतरी पुणे भारनियमनमुक्त आहे; परंतु या शहराचा विकासदर लक्षात घेता तेथे पुन्हा भारनियमन सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर विजेची काटकसर करणे एवढाच उपाय सध्या तरी शक्य आहे. पुण्यातील सर्वच मोठ्या कंपन्यांनी एनर्जी ऑडिट करून घेतले आणि त्या निष्कर्षांप्रमाणे योग्य कार्यवाही केली, तर किमान १५ टक्के वीजबचत होऊ शकते. एकट्या पुणे महापालिकेची विजेची गरज वर्षाला वीस कोटी युनिट एवढी आहे. त्यात दहा टक्के बचत करता आली तरी किमान दोन कोटी युनिट वीज (वीस हजार घरांच्या वार्षिक वापराइतकी) वाचणे शक्य आहे.
३) रस्ते व वाहतूक - या विषयावर गेल्या वर्षभरापासून "सकाळ'ने जो "जागर' चालवला आहे, त्यामुळे सर्वच पातळ्यांवर या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजनांसाठी काम चालू आहे. पुण्यात आज उपलब्ध असलेल्या १८०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांवर पुण्यातील सर्व वाहने एकाच वेळी रस्त्यावर आली, तर ७० टक्के रस्त्यांचे क्षेत्र व्यापले जाईल. या एकाच गोष्टीवरून या समस्येचे गांभीर्य लक्षात येते. याचा आणखी एक घातक परिणाम म्हणजे पुण्यात हवेतील धूलिकण, सूक्ष्मकण व विषारी वायूंचे प्रमाण राष्ट्रीय मानकांच्या दीड ते दोन पट अधिक आढळते. शहरातील आवाजाची सरासरी पातळी ६४ डेसिबल (चौकांमध्ये ८४ डेसिबल) झाली आहे. या सर्वांचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम होतो.
रस्त्यांची रुंदी वाढवणे, नवीन रस्ते विकसित करणे, यासारख्या तत्कालीन उपाययोजनांबरोबरच सेनापती बापट मार्ग, सहकारनगर यासारख्या ठिकाणी पर्यावरणाची हानी होऊ न देता बोगदे काढणे, खराडी ते वारजे या नदीपात्रातील रस्त्याचे काम मार्गी लावणे यासारखे उपाय तातडीने हाती घ्यावे लागतील. पीएमटी व पीसीएमटी या बससेवांच्या विलीनीकरणातून "पीएमपीएल' ही नवी संस्था निर्माण झाली आहे. या संस्थेला नवीन बसगाड्या घेण्यासाठी त्वरित पैसा उपलब्ध करून देणे, सर्वच मार्गांच्या शास्त्रीय अभ्यास करून मार्ग व बससंख्या यांचे नियोजन करणे अत्यावश्यक आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली पाहिजे, यावर सार्वत्रिक एकमत आहे. त्यामुळे या वर्षांत त्या दृष्टीने भरीव उपाययोजना होतील, अशी अपेक्षा करू या.
४) घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी शुद्धीकरण - घनकचरा व्यवस्थापन हाही विषय "सकाळ'ने गेल्या वर्षभरापासून लावून धरल्याने त्यावर विचारमंथन सुरू झाले आहे. घनकचरा संकलन, प्रक्रिया व पुनर्वापर तसेच ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. वाढती घरबांधणी व रस्तेबांधणी यामुळे तयार होणारा लाखो टन राडारोडा, तसेच शेकडो टन संगणकीय कचरा यांच्या विल्हेवाटीसाठी तातडीने धोरण आखणे आवश्यक आहे. पुण्यातील एकंदर सांडपाण्यापैकी सुमारे तीस टक्के सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. सांडपाण्याचे वहन व शुद्धीकरण यासाठी प्रचंड खर्च येतो. शहराची पुढील वाढ लक्षात घेऊन याचे दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे.
वीजपुरवठा, पाणीपुरवठा, सांडपाणी शुद्धिकरण या सर्वांचे नियोजन करताना पुण्याची वाढ कुठे व कशी होणार आहे, याचा व्यापक अभ्यास करून योजना तयार झाली पाहिजे. तसे झाल्यास वारंवार रस्ते खणायला लागणे, पाईपलाईन बदलणे असे प्रकार कमी होतील. म्हणूनच एकात्मिक नियोजन आवश्यक आहे.
सुविधांची गुरुकिल्ली
- रस्ते रुंद आणि प्रशस्त बनवा. त्यांची निगा राखा
- सार्वजनिक वाहतूक सुधारा. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी फक्त सरकारी प्रयत्न पुरेसे नाहीत, तर प्रत्येक नागरिकाने वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन केले पाहिजे.
- सार्वजनिक स्वच्छता ही सार्वजनिक आरोग्याची पहिली पायरी आहे. तिची सुरवात आपल्या घरापासूनच झाली पाहिजे.
- घरातील केरकचरा रस्त्यावर फेकण्याऐवजी तो कटाक्षाने कचरा कुंडीतच फेकावा. हा नियम साधा वाटला तरी, त्यातून सार्वजनिक आरोग्याचे मोठे काम होते, याची जाणीव असू द्या.
- पाणीपुरवठा ही सरकारची जबाबदारी आहे. पण पाण्याचा काळजीपूर्वक वापर ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. शुद्ध पाणी मिळणे हा जसा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, तसाच पाण्याची स्वच्छता टिकविणे हे त्याचे कर्तव्य आहे.